१. बुडून कठोरतापूर्वक खेचणाऱ्यांची शपथ.१
२. बंधन उकलून सोडविणाऱ्यांची शपथ.
३. आणि पोहणाऱ्या फिरणाऱ्यांची शपथ. १
४. मग धावत पुढे जाणाऱ्यांची शपथ!
५. मग कार्याची योजना करणाऱ्यांची शपथ!
६. ज्या दिवशी थरथर कांपणारी थरथर कांपेल,
७. त्यानंतर एक मागे येणारी (मागोमाग) येईल.
८. (अनेक) हृदय त्या दिवशी धडधड करतील.
९. ज्यांच्या नजरा खाली असतील.
१०. असे म्हणतात की, काय आम्हाला पहिल्यासारख्या अवस्थेकडे पुन्हा परतविले जाईल?
११. काय अशा वेळी की जेव्हा आम्ही अगदी जीर्णशीर्ण हाडे होऊन जाऊ?
१२. म्हणतात की मग तर हे परतणे नुकसानदायक आहे. (माहीत असले पाहिजे)
१३. की ती तर केवळ एक (भयानक) दरडावणी आहे.
१४. (जी दिली जाताच) ते एकदम मैदानात जमा होतील.
१५. काय, मूसा (अलैहिस्सलाम) चा वृत्तांत तुम्हास पोहचला आहे?
१६. जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने तूवाच्या पवित्र मैदानात पुकारले.
१७. (की) तुम्ही फिरऔनजवळ जा, त्याने बंडखोरी (उदंडता) अंगीकारली आहे.
१८. त्याला सांगा की, काय तू स्वतःची दुरुस्ती आणि सुधारणा इच्छितो.
१९. आणि हे की मी तुला तुझ्या पालनकर्त्याचा मार्ग दाखवू यासाठी की तू (त्याचे) भय बाळगू लागावे.
२०. तेव्हा त्याला मोठी निशाणी दाखविली.
२१. तर त्याने खोटे ठरविले आणि अवज्ञा केली.
२२. मग पुन्हा परतला प्रयत्न करीत१
२३. मग सर्वांना एकत्र करून उंच स्वरात ऐलान केले.
२४. म्हणाला, तुम्हा सर्वांचा पालनहार मीच आहे.
२५. तेव्हा (सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ) अल्लाहने देखील त्याला आखिरत (मरणोत्तर जीवना) च्या आणि या जगाच्या शिक्षा - यातनेत घेरले.
२६. निःसंशय, यात त्या माणसाकरिता बोध आहे, जो भय राखील.
२७. काय तुम्हाला निर्माण करणे अधिक कठीण आहे किंवा आकाशाला? सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्याला निर्माण केले.
२८. त्याची उंची वाढविली, मग त्याला यथायोग्य केले.
२९. आणि त्याच्या रात्रीला अंधकारपूर्ण बनविले आणि त्याच्या दिवसाला प्रकट केले.
३०. आणि त्यानंतर जमिनीला (समतल) बिछविले.
३१. त्यातून पाणी आणि चारा काढला.
३२. आणि पर्वतांना (मजबूत) रोवले.
३३. हे सर्व तुमच्या आणि तुमच्या जनावरांच्या फायद्यासाठी (आहे).
३४. तर जेव्हा ते मोठे संकट (कयामत) येईल.
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील.
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल.
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल).
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल).
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे.
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल.
४१. तर त्याचे ठिकाण जन्नतच आहे.
४२. लोक तुम्हाला कयामत केव्हा घडून येईल असे विचारतात.
४३. ते सांगण्याशी तुमचा काय संबंध?
४४. तिच्या ज्ञानाची अंतिम सीमा तर अल्लाहकडे आहे.
४५. तुम्ही तर फक्त तिच्याशी भयभीत राहणाऱ्यांना सावधान करणारे आहात.१
४६. ज्या दिवशी हे तिला (प्रत्यक्ष) पाहून घेतील तेव्हा असे वाटेल की केवळ दिवसाचा अंतिम भाग अथवा आरंभीचा भागच ते (या जगात) राहिलेत.